![]() |
मनसेचे नेते वसंत मोरे यांचा पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वसंत मोरे म्हटले की, पक्षाच्या स्थापनेपासून ( किंबहुना त्याच्या अगोदर पासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरामध्ये आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहीलो आहे. मात्र अलीकडच्या काळात पुणे शहरामधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असल्यामुळे माझ्यासाठी ते अत्यंत वेदनादायी आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
त्यानंतर भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत त्यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत आणि उपक्रम देत असतो. त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. त्यामुळे आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतरही सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती असं मोरे राजीनामा पत्रामध्ये म्हणाले आहे.
मागच्या बऱ्याच महिन्यांपासून वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूकीची तयारी करत आहे. वारंवार त्याबद्दल ते जाहीरपणे इच्छुक असल्याचे बोलतही होते. मात्र पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील आपण पुण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. पण त्याआधीही वसंत मोरे यांनी पक्षामधील स्थानिक नेत्यांकडून जाणूनबुजून डावलले जात आहे. कुठलाही बैठकीला आमंत्रित केले जात नसल्याचे म्हणाले होते. तर त्यामुळे वसंत मोरे आणि त्यांची पक्षावर असलेली नाराजी हा पुण्यात चर्चेचा विषय झाला आहे.